Sunday, October 26, 2014

नसलेल्या ताईचा कोष

 रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी मी फक्त माझाच राहतो - स्वेच्छेने नाही, नाईलाजाने! या दोन दिवशी मनाच्या तळघरात गाडलेली एक अनाम, अकारण, निरर्थक भीती डोकं वर काढते - जवळची सगळ्यात प्रिय माणसं कायमची गमावण्याची भीती. माणसं जमवण्याच्या आणि प्राणपणाने जपण्याच्या अंगभूत सवयीचं, ही भीती, हे 'बायप्रोडक्ट' आहे. पण ही भीती प्रत्यक्षात न जमवलेल्या कोणाच्या ऑलरेडी गेले असण्यानं पैदा होऊ शकते? कदाचित हो - निदान माझ्या बाबतीत तरी असंच झालं असेल.

ताईचं नाव शिवानी. तिचे एक-दोन वर्षाची असतानापर्यंतचे मोजके फोटो, हीच आणि इतकीच तिची नि माझी ओळख. फोटोत दिसणारं बाळ म्हणजे एकेकाळी अस्तित्त्वात असलेली माझी ताई, हे वास्तव समजायला काही वर्षं लागली. पण त्यानंतर आजतागायत दोन दशकं उलटूनही, हे वास्तव समजून-उमजूनसुद्धा स्वीकारता मात्र आलेलं नाही. चालू आहे तो फक्त ताई नसल्याच्या जाणिवेसोबतचा सततचा झगडा आणि तिचं माझ्याभोवती, मला समांतर, आभासी असणं. या अस्तित्त्वाचा कोष तयार केलाय मीच, आणि त्यात गुरफटूनही घेतलंय स्वत:ला - स्वेच्छेनं. आईकडून कितीतरी किस्से ऐकलेत - ती कशी दिसायची, कशी बोलायची, कशी खेळायची, मी आईच्या पोटात असताना पोटाला हात, कान लावून कशी ऐकायची आणि हसायची वगैरे. आणि जे आईने सांगितलं नाही, ते तिच्या डायरीत वाचलं, चोरून. मग अनेक गोष्टींचा उलगडा झाला हळूहळू. बाबा, आजी तिच्याबद्दल काहीच का बोलायचे नाहीत, आई सगळं डायरीत का लिहीत गेली वगैरे. कदाचित त्यामुळेच जेव्हढं माहीत झालं, त्यावरून अजाणतेपणाने तयार केलेला हा कोष मी कायमचा सांभाळायचा ठरवलं असेल.

नाही म्हणायला, गरज तर होतीच ताईची; अगदी रोज नाही नक्की, पण आई बेदम मारायची तेव्हा तिच्यापासून लांब पळून जाण्यासाठी, बिल्डींगमधल्या मित्रमैत्रिणींसोबत कडाक्याची भांडणं व्हायची तेव्हा आपल्या बाजूने कुणीतरी लढावं म्हणून, वडापाव आणि कोकसाठी पैसे मागता यावेत म्हणून, स्कूलबसमधून नाही तर पायी शाळेत जायचंय पण दादर स्टेशनासामोर स्वामीनारायण मंदिराजवळ क्रॉस करायची जाम भीती वाटायची तेव्हा, कुणाच्या तरी प्रेमात आकंठ बुडालो होतो आणि तिने नाही म्हटल्यावर झालेली कालवाकालव सांगायची होती तेव्हा, शाळेत नेहमी पहिला नंबर काढणारा मी मास्टर्स करताना लाज वाटेल असा जी.पी.ए का आणतोय याचा जाब द्यायचा होता तेव्हा, लग्नात मुंडावळ्या बांधून घ्यायच्या होत्या तेव्हा. गरज नाही कदाचित, स्वार्थ म्हणू हवं तर! या स्वार्थापोटी मग शिक्षण, नोकरी, देशांतर निमित्ताने संपर्कात आलेल्या ताईसारख्या अनेक मैत्रिणींमध्ये ताईला शोधलं, गरज भागवली, स्वार्थ साधला, रक्षाबंधन नि भाऊबीज जपली आणि अशीच एक मानलेली ताई गमावलीसुद्धा - खऱ्याखुऱ्या ताईसारखीच.….

….मग पुन्हा त्या भीतीने डोकं वर काढणं वगैरे नेहमीचंच! आता सवय झालीये.

आज भाऊबीज मोठी, सरते पुन्हा दिवाळी,
ओवाळण्यास मजला नशीब उरले आहे.

रेषा कुठली चुकीची कळण्यास वाव नाही,
भरल्या हातावरुनी नशीब उठले आहे.

Tuesday, March 09, 2010

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच,
मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -
https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

Thursday, November 08, 2007

जानू



... त्यानंतर मी जानूला आजतागायत पाहिलेलं नाही.

*******
दिवाळीच्या आधीचे दहा-एक दिवस म्हणजे जानूच्या वरकमाईचा 'पीक पीरिअड'. अख्ख्या चाळीची - चाळीतली घरे धरून - साफसफाई करण्याचं कंत्राट त्याच्या हातात पडलं, की घराघरातून मिळणारी दिवाळी, चाळीच्या सफाईची कमिटीने ठरवलेली रक्कम आणि गोडाधोडाचं जेवण यात त्याचीही दिवाळी चांगलीच साजरी व्हायची. माझ्या आईबाबांच्या महिन्याच्या घेणेकर्‍यांच्या यादीत दिवाळीच्या महिन्यात पोस्टमन, टेलिफोनवाले,भंगी यांच्या जोडीला जानूचंही नाव सामील व्हायचं. अभ्यंगस्नानानंतरचा फराळ चवीचवीने खाण्यात नि गप्पाटप्पा करण्यात घरातील मंडळी मश्गूल, फटाके उडवण्यात आम्ही पोरं मग्न आणि जवळच्या 'समुद्रा'मध्ये नारिंगी मारण्यात जानू बुडालेला. बोळातल्या सप्तरंगी फरशीवर पडलेले भुईचक्रांचे नि अनाराचे डाग, त्यांचे जळून गेलेले तुकडे, फुटलेल्या लक्ष्मी बारच्या दारूचा वास, फुलबाज्यांच्या कांड्या दुसर्‍या दिवशी गायब दिसत; तिकडे डोकीला चट्टेरीपट्टेरी गुलाबी-पांढरा मफलर गुंडाळून जानू वाकडातिकडा झोपलेला असायचा. त्या चट्ट्यापट्ट्यांत विणलेले स्वतःच्याच आयुष्याचे कित्येक रंग, त्याला बोळातल्या मीटरबॉक्सच्या आसपास कबुतरांनी घातलेल्या शिटांच्या रांगोळीसारखे तरी वाटले असतील का, याचा विचार मी अजूनही करतो आहे.

आयुष्यभर लाल आणि राखाडी अशा दोनच चड्ड्यांमध्ये जानू वावरत असावा. जानू बाल्या नव्हता. गळ्यात रुमाल नाही, पायात घुंगरू नाही, तोंडी बाल्यांची भाषा नाही नि बोलण्यात ते हेल नाहीत. फक्त चड्डी, काखेत आणि मानेजवळ झुरळांनी खाऊन झालेल्या लहानमोठ्या भोकांच्या नक्षीचा बाह्यांचा गंजीफ्रॉक, मातकट तपकिरी पण तजेलदार त्वचा, मिठाईवरच्या चांदीच्या वर्खासारखे वाटणारे खुरट्या गवतासारखे छातीवरचे नि डोक्यावरचे चंदेरी-राखाडी केस, पिवळट तर्राट डोळे, ओठांवर, गालांवर नि हनुवटीवर इंच-दीड इंच वाढलेले तण, ट्रकमध्ये भिरकावलेलं धान्याचं पोतं जसं एकाच बाजूने आत जातं; तसं करदोर्‍याचा वर एकाच बाजूने खपाटीला गेलेलं पोट, आणि गावच्या भातशेतीपासून राजकारणापर्यंत सगळ्या विषयांवर हक्काने बोलताना पाच मिनिटांनी एकदा या रेटने गंजीफ्रॉक वर करून गजकर्ण झाल्यासारखा कंबर कराकरा खाजवणारा जानू पाहतच मी लहानाचा मोठा झालो. मतदानाला आणि लग्नसमारंभाला जाताना लाल चड्डीवर घालायचा काळे त्रिकोण-चौकोन-वर्तुळे असलेला भूमितीय बुशकोट, पानाची चंची, दाढीचं सामान, त्यातच फुटक्या आरशाच्या काचेचा तुकडा, कंगवा आणि माझ्या शाळेच्या दप्तरापेक्षा जराशी मोठी एक पत्र्याची ट्रंक ही जानूची जन्मभराची पुंजी. इतक्या मोजक्या (की मोडक्या) पुंजीत त्याने आपल्या मुलीचं - सोनीचं लग्न लावलं, बायकोच्या शेवटच्या दिवसात मुंबईतूनच तिचं आजारपण काढलं, आपल्या मुलाला - दाम्याला जेमतेम शिकवून मुंबईत नोकरीला आणलं. चौदा-पंधरा वर्षांपूर्वी बोळात दामूबरोबर गोट्या खेळताना हाच पोरगा उद्या आमच्या घरी जानूबरोबर भांडी घासायला येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. धुणीभांडी हा जानूचा खानदानी रोजगार असावा बहुतेक!

जानू भुवडला कोकणातल्या तळे गावातून बनूताईंनी दादरला आमच्या चाळीत आणलं. गिजा,आनंदी, शेवंता, नारायण, बाबू, रोंग्या ... किती नावं घ्यावीत?! आजकाल बड्या धेंडांच्या वॉचमनची केबिन असते तेव्हढ्या आकाराच्या, चाळीत शिरल्याशिरल्या चौकाला लागून असलेल्या एका खोलीत चाळीच्या सात गड्यांचं कुटुंब जेवायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं... जानू त्यांच्यातल्या सगळ्यात नशीबवान गडी. त्याने आल्यापासूनच धरलेला तिसरा मजला कधी सोडलाच नाही. घराघरातून मिळणारं दिवसाचं उरलेलं जेवण, कधीकधी सेन्ट्रल लंच होमचा तळलेला थंडगार बांगडा, सुका फळफळीत भात आणि समुद्राची नारिंगी यापुढे त्याला काही शिजवायची गरजच पडली नाही. पण अशा रावसाहेबी थाटांपुढे त्याने कामात कुचराई केली नाही. इमानेइतबारे धुणीभांडी करत राहिला. अभ्यास केला नाही तर थोतरीत ठेवून देताना समस्त आयांनी "कार्ट्या, जानू व्हायचंय का?"म्हणून त्याचा तसा आदर्शही काही काळ आम्हा सगळ्यांपुढे ठेवलाच होता. असं म्हटल्यावर जानूही तंबाखूने तांबडेपिवळे झालेले दात विचकून "फुकनीच्या, लिव नीट न्हाय्तर ही माज्या बापाचा सत्कार कराय्लिये" म्हणून विचित्र हसायचा. त्याचं ते शिवराळ हसणं मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला साजेसंच होतं. जानूला भडकलेलं मी कधी पाहिलंय असं नीट आठवत नाही. जेव्हा तो हसायचा नाही तेव्हा भडकलेला, वैतागलेलाच असायचा, असंही कदाचित म्हणता येईल. त्याच्या चेहर्‍यावरच्या सतरंज्या झोपताना, भांडी घासताना, पेपर वाचताना (खरे तर बघताना!) आणि शिव्या देताना सारख्याच रिन्कल फ्री असायच्या. त्याच समर्पित कर्मयोगी भावनेनं तो भांड्यांना राखुंडी लावायचा, ती विसळायचा.

माझ्या वडिलांच्या पिढीपासून चाळीतलं प्रत्येक पोर तीनेक वर्षाचं होईस्तोवर जानूबरोबर खेळलेलं आहे. मी सुद्धा. माझ्यासोबत किंबहुना माझ्यामागे सहा-सात वर्षांनी वाढलेल्यांनादेखील जानूची गावरान बडबडगीतं आजही तोंडपाठ आहेत. शेजारच्या प्रियांकाचं नावही नीट न घेता येणारा जानूच फक्त तिला गौरी म्हणतो. गौरी हे आपल्याच लेकीचं दुसरं नाव आहे, हे तिच्या आईवडिलांच्याही लक्षात नसेल कदाचित, पण जानूला मात्र बरोबर माहीत आहे. मी, प्रियांका, कुणाल, अमोघ ... डावा हात वर करून, उजवा हात कमरेवर ठेवून, गुडघ्यात जरासं वाकून ढुंगण हलवत नाचणारं आमच्यापैकी कोणीतरी आणि समोर अगदी तसाच नाचणारा जानू असं छायाचित्र माझ्या आठवणींचे अल्बम सोडून दुसरीकडे कुठेही नाही. वयोमानानुसार जानूचं शरीर थकलं, पण त्याचं पोरं खेळवणं थकलं नाही, नाचगाणं थकलं नाही; गावाकडच्या गोष्टी थकल्या नाहीत आणि त्याचं ते विचित्र हसणंही थकलं नाही. जानूशी आमची मैत्री न रुचलेल्या काही दुष्ट आईवडिलांनी तो करणी करत असल्याची कंडीही काही काळ पिकवली होती. एका मध्यरात्री "धरलान् धरलान् आईच्याने ... ये भोकाच्या ... छाताडावरचा ऊट ... धरलान् धरलान्"असं भेसूर ओरडत झोपेतून उठून शून्यात गेलेला जानू बघितल्यापासून तर या अफवांना अधिकच जोर आला. सुदैवाने त्याची परिणती जानूची चाळीतली कामं जाण्यात आणि आमच्यासारख्या अनेकांच्या अयुष्याची सुरुवातीची तीन वर्षं बेरंग होण्यात झाली नाही, याचं समाधान आहे. का कोण जाणे, पण जानूचं पोरांवरचं आणि पोरांचं जानूवरचं प्रेम, ते जिव्हाळ्याचे बंध यांना पालक वर्गाकडूनही स्वीकृती मिळू लागली असावी, असं आज वाटतं.

चाळीच्या चौकातली दहीहंडी जानूच्या गाण्यांशिवाय चालूच व्हायची नाही. गडी आणि आम्ही मुलं एकत्र येऊन दहीहंडी साजरी करायचो. चाळीतल्या आम्हा मुलांप्रमाणेच हंडी फोडण्याचा मान गड्यांमध्येही कोणालातरी कधीतरी मिळायचाच. पण 'येक दोन तीन चार, जनाबायीची प्वरं हुशार','ल्लाल ल्लाल पागुटं गुलाबी श्येला, जानूमामा गेला जीव झाला येडा' ही सगळी गाणी जानूने - आणि त्याच्या मागोमाग आम्ही - म्हटल्याशिवाय टांगलेल्या हंडीभोवती फेर धरायचाही उत्साह कुणाच्यात संचारायचा नाही. त्याच्या आवाजाने मग चाळ जागी व्हायची आणि आमच्यावर दुधापाण्याचे अभिषेक व्हायचे. हंडीनंतरचं गूळखोबरं वाटायलाही जानूच चाळभर फिरायचा. अंघोळी वगैरे आटोपून आम्ही आणलेल्या समोशांवर ताव मारायचो आणि जानू मात्र तेव्हा सरळ 'समुद्रा'च्या वाटेवर असायचा. होळीच्या रात्री बोंबा मारायला जातीने हजर आणि कार्यतत्पर असणारा जानू दुसर्‍या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी मात्र नेमाने गायब असायचा. संध्याकाळी तो चाळीत गपगुमान फिरताना, काम करताना दिसला की त्याच्या डोक्यावरचा गुलाल पाहून त्याची रंगपंचमी रंगीत आणि नारिंगीने सुगंधितही झालेली आहे, हे कळायला कुणी तज्ज्ञ लागायचा नाही. पण चाळीतल्या अशा प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाचा जानू एक अविभाज्य घटक असायचा. गणपतीच्या वेळी साधा आरतीला गेलाबाजार आरतीचा प्रसाद हाणायलाही चौकात न उतरणारा जानू नाटकाच्या रात्री फुकटात मसाला कॉफी प्यायला मिळते म्हणून आणि दुसर्‍या दिवशी महाप्रसादाला चमचमीत जेवायला मिळतं म्हणून (अर्थातच फुकटात!) बरोबर हजेरी लावायचा. लोक देवाच्या भक्तीत दंग असताना याची मोरीत भांड्याकुंड्यांशी भजनं रंगलेली असत. किंबहुना देवाशी त्याचं भांड्यांमुळेच भांडण असावं, असंसुद्धा वाटतं कधीकधी.

आमच्यासारखे काही महाभाग जानूत गुंतणं स्वाभाविक होतं. पण जानू आमच्याबरोबरच आमच्या आजीआजोबांच्या पिढीतही गुंतला होता. माझी आजी भ्रमिष्टावस्थेत "जानू जरा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे?" असं बरळली असताना हेलावून त्याने तिच्या पायावर डोकं ठेवलं होतं. "संध्याकाळी देतो आजी" यापलीकडे तो काही बोलू शकला नाही. आजपर्यंत फक्त त्या दिवशीच मी त्याच्या चेहर्‍यावरची सतरंजी विस्कटलेली पाहिली.

कामाच्या वेळी यंत्रवत्, आत्ममग्न काम; आणि काम नसेल तेव्हा निव्वळ टाइमपास, हे जानूच्या जगण्याचं सूत्र. जानू जरासा बेदरकार होता, व्यसनी होता, हे सगळं खरं आहे. पण त्याने कधी स्वतःच्या व्यसनांचा तमाशा केला नाही. दारू पिऊन आलेला असला, तरी आरडाओरडा, धिंगाणा नाही; मोठमोठ्याने अर्वाच्य शिवीगाळ नाही. "बाबा लय पितु" असं दामूही दोनेक वर्षांपूर्वी म्हणू लागला होता. तटस्थपणे त्याच्या पिण्याची कारणं शोधून काढायचं सामंजस्य, इच्छा, वेळ, कुवत - यांपैकी काही एक माझ्याकडे त्यावेळी नव्हतं. ना त्याची परिस्थिती, दु:ख वगैरे समजून घेण्याचं माहात्म्य होतं. जानूच्या वर्तणुकीतून तो मला जसा उलगडत गेला, तसा मी त्याचे हे सगळे रंग बघत गेलो. जानूचं जगण्याचं तत्त्वज्ञान काय, याचा अर्थही माझ्याच परीने लावलेला. उद्या त्याला असे भलतेसलते प्रश्न विचारायला गेलो, तर तो मला वेड्यात काढेल आणि असा काही (नेहमीसारखाच!) विचित्र हसेल, की माझ्यासारख्या पांढरपेशाला शरम वाटेल. असे चौकटीतले विचारच माझ्यासारख्यांना यंत्रांमागच्या भावना कळू देत नाहीत, असं वाटतं. मी भारत सोडून येताना बोळात जानू नेहमीसारखाच झोपला होता. भारतभेटीच्या वेळी "काय जानू, काय म्हन्तासा?" असं विचारायची संधी मिळेल आणि जानूही त्याला शिवराळ हसून उत्तर देईल असं वाटलं. म्हणूनच मी त्यावेळी त्याच्या पाया पडण्यासाठीही त्याला उठवलं नाही.

... त्यानंतर मी जानूला आजतागायत पाहिलेलं नाही

Wednesday, July 12, 2006

आजी नावाची मैत्रीण

मनोरमणा, मधुसुदना,
मुखी राहो माझ्या,
प्रभो हे नाम सदा

आजीचं हे गाणं ऐकलं की आमच्या घरातला मधुसूदन (म्हणजे मी!) डोळे किलकिले करून स्वयंपाकघरात बघायचा. मोरीतून नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेली, डोक्याला पंचा गुंडाळून, देवाला उदबत्ती ओवाळणारी आजी दिसायची. निळ्या किंवा गुलाबी फ़ुलांचं नाज़ूक नक्षीकाम केलेली पांढरी नऊवारी, डोळ्याला दुधी काचांचा, ज़ाड काळ्या फ़्रेमचा चष्मा आणि गोड आवाज़ातली भक्तीगीतं. स्वयंपाकघरातून दरवळणारा उदबत्तीचा मंद सुगंध. सकाळचे सहा वाज़लेत, हे सांगायला आमच्या घरात गजराच्या घड्याळाची गरज़ नव्हती. आजीचं 'मनोरमणा, मधुसुदना' पुरेसं होतं.

मधुसूदन आणि चक्रपाणि या नावांमधली समानता आजीने तिच्या जिवापाड ज़पली होती. माझ्या रुपाने साक्षात तिचा बाळकृष्णच या पृथ्वीतलावर अवतरल्याचा साक्षात्कार तिला झाला आणि तिने अस्मादिकांचं नामकरण 'चक्रपाणि' असं केलं. तिच्या बालपणीच्या एका लाडक्या वर्गमित्राचं नाव चक्रपाणि होतं, असं तिने सांगितलं होतं. हा चक्रपाणि म्हणजे माझ्या आजीचं त्यावेळचं 'क्रश' असावं, म्हणून मी तिला चिडवतही असे. मग आई डोळे वटारून बघत असे; पण त्यातही आजीला काय मजा आणि कौतुक वाटायचं तिचं तिलाच ठाऊक! "बघ गो, बंड्या कसा अगदी बाळकृष्णासारखा खोडकर आहे!", असं आजीने म्हटलं रे म्हटलं की माझ्यात विजयश्री संचारायची आणि पोरापुढे पड खायला लागली की आई ज़रा तणतणतच आपल्या कामाला लागायची.

आजीच्या सगळ्या नातवंडांमध्ये मी शेंडेफळ. खरे सांगायचे तर मी शेंडेफळाचे शेंडेफळ. म्हणजे बाबांच्या (की आज़ोबांच्या? ;)) कृपेने आम्ही आजीच्या खास मर्जीतले. मग तिचं प्रेम थालिपीठ, ताकाची उकड, मोकळी भाज़णी, आप्पे, उपमा, पोहे अशा अनेक रुपांमधून ओसंडून वहायचं. आजीच्याच हट्टाखातर माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. मूलभूत शिक्षण हा ज्ञानाचा पाया; तो मातृभाषेतच भक्कम व्हावा, यावर आजीचा अढळ विश्वास होता. छोट्या शिशुत असल्यापासून शाळेच्या नि माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, शिशुवर्गातल्या 'शि शु' पासून ते बाराखडी, घड्याळ, वार-महिने, पाढे सगळं सगळं आजीने इतकं लीलया सांभाळलं, की नोकरदार आईबाबांना कसली चिंताच नको! आईबाबांनी मला जेव्हढं झोडपलं, त्याच्या एक सहस्त्रांशही आजीने केलं नसेल. तिने माझ्यावर हात उगारलेला मला मुळी आठवतच नाही. आजी रागावली, की तिच्या डोळ्यांत आणि आवाज़ातच तिला काय म्हणायचंय आणि मी काय केलं पाहिज़े, हे कळून चुकायचं. ज़राशा धोक्याच्या अज़ाण वयात पहिल्यांदा बरोबरीच्या मुलांच्या नादाने ज़ुगार खेळलो होतो, तेव्हा मात्र तिने थोबाड रंगवल्याचे चांगलेच आठवते आहे. नंतर ती माझ्याशी आठवडाभर बोलली नव्हती. शेवटी मी कळवळतोय, हे बघून आईनेही तिचे पाय धरले, तेव्हा ति काहीशी नरमली.

बेळगावातल्या खानापूरसारख्या छोट्या गावातून लग्न होऊन मुंबईत आलेली माझी आजी आयुष्यातली सोनेरी वर्षं बिनपगारी मोलकरणीसारखी ज़गली. आज़ोबांच्या तऱ्हा सांभाळणं काही खायचं काम नव्हतं; पण तऱ्हेवाईक नवरा आणि पोटची तीन मुलं असा रगाडा तिने यशस्वीपणे सांभाळला. प्रसंगी आज़ोबांच्या बुटांचा मार खाल्ला, पोरांची आज़ारपणं सोसली, पण हूं नाही की चूं नाही. 'पत्नी' या व्यक्तिरेखेकडून त्या काळात ज़े अपेक्षित होतं, ते तिनं इमानेइतबारे पार पाडलं. आज़ोबा निवृत्त झाल्यावर त्यांच्याबरोबर संध्याकाळी वेणीफणी, गज़रा, पावडर करून एकदम 'टिपटॉप' फ़िरायला, बाज़ारहाट करायला ज़ाणं; नातवंडांना गोष्टी सांगणं आणि त्यांच्याबरोबर खेळणं, हे आजीच्या नशिबात तसं उशीराच आलं, असं म्हणायला हवं. आईबाबांकडून या सगळ्या गोष्टी ऐकताना आजीबद्दलचा आदर आणि प्रेम दुणावतं. ज़ावयाच्या मोठ्या पोरीला ज़वळज़वळ आठ-एक वर्षं स्वतःच्या पोटच्या पोरीसारखं वाढवणारी आजी, माझ्या चुलतभावंडांचे धिंगाणे नि सगळ्या मर्कटलीला सोसणारी आजी, हे सगळं मला नुसतं ऐकायलाच मिळालंय. पण तिच्या सहवासात मी ज़े अनुभवंलय, ते शब्दांत - आणि तेही मोज़क्या - मांडणं खरोखरंच कठीण आहे.

आजी तशी हलक्या कानाची. कुणी तिला काहीही थोड्याशा 'कन्विन्सिंग' पद्धतीने सांगितलं की तिचा त्यावर लगेच विश्वास बसायचा. मामाआज़ोबांबरोबरची तिची भांडणं नि त्यानंतर धरलेला अबोला, काकूबरोबर उडालेले खटके, आईबरोबरची वादावादी सगळे त्याचेच छोटेमोठे परिणाम. रागावली, की तिच्या आवाज़ाला आणि भाषेला खास बेळगावी धार चढायची. मग समोर उभी असलेली व्यक्ती माझे बाबा असोत, शेज़ारच्या कानिटकर आजी असोत, की भांड्याला येणारा जानू गडी असो. "आमचंच खाऊन दात काळे झालेत त्या XXXच्या कानिटकरणीचे!" हे जेव्हा मी पहिल्यांदा आजीच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पायाखालची ज़मीन सटकली होती दोन सेकंद. जानूमामाची तर ती ज़वळज़वळ दररोज़ बिनपाण्याने हजामत करायची. 'मी, माझी मुलं आणि नातवंडं सद्गुणांचे पुतळे आणि ज़ावई नि सुना एक नंबर हरामखोर', हा तिचा समज़ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणी दूर करू शकले नाही. पण शेवटच्या काही क्षणांमध्ये, तिच्या भ्रमिष्टावस्थेत, जेव्हा अगतिकपणे 'जानू, ज़रा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे', असं तिने विचारलं तेव्हा जानूमामाही हेलावला होता. ती कितीही रागीट असली, तरी तिचा रागही बहुतेक सगळ्यांना हवाहवासा होता ;) अखेरच्या काही दिवसात, तिला पंख्यावर दत्ता फडणीस म्हणून कोणीतरी दिसायचा. "दत्त्या, मेल्या, पंख्यावर काय बसतोस? खाली ये की मुडद्या" कधीकधी रात्रभर असं चालायचं आणि आम्ही पंख्यावर दत्त्याला शोधायचो. मालूने (आजीची सगळ्यात धाकटी बहीण) प्रेमानंदाशी पळून ज़ाऊन प्रेमविवाह केला, असं जेव्हा आजीने म्हटलं, तेव्हा त्याही प्रसंगात आम्ही पोट धरून हसलो होतो.

'लीलाच्या नातवाने नाव काढलं हो!' असं तिच्या बहिणींनी म्हटलं, की तिला कोण आनंद व्हायचा. मग ती लगेच मला कुशीत घ्यायची. 'लीलाचा नातू' ही ओळख माझ्यापेक्षा तिला जास्त महत्त्वाची होती. शेवटी शेवटी तिचे जे काही श्वास चालू होते, ते फ़क्त 'लीलाच्या नातवा'साठीच होते. छताकडे डोळे लावून कॉलेजला ज़ाताना "बंडू, आल्यावर काय करायचं रे खायला?", असं तिने विचारलं, तेव्हा गलबलून आलं. "आजी, उकड कर मस्तपैकी" असं सांगून मी घरातून तातडीने बाहेर पडलो होतो. मला तिकडे थांबणं ज़मलंच नसतं.

सात-आठ वर्षांपूर्वी मी तिला म्हटलं होतं की मी तिला माझ्याबरोबर अमेरिकेला नेईन. मी सोडून सगळ्या नातवंडांच्या लग्नाला ती हज़र होती आणि म्हणूनच माझ्या लग्नाआधी डोळे मिटायचे नाहीत, असं मी तिच्याकडून प्रॉमिसही घेतलं होतं. कदाचित तिला काही बातम्या आधीच कळल्या होत्या. म्हणून बारावीत असतानाच मी तिला 'लग्नाळू' झाल्यासारखे वाटत होते.

बारावीचा निकाल लागला, आणि त्यातलं माझं सुयश हीच तिच्या आयुष्यातली शेवटची आनंदाची बातमी ठरली. कदाचित ती या बातमीचीच वाट बघत थांबली होती. आज़पर्यंत कोणत्याही परीक्षेला ज़ाताना तिच्या पायाला हात लावून ज़ायची इतकी सवय झाली होती, की अभियांत्रिकीची चार वर्षं तिच्या नुसत्या फ़ोटोच्या पाया पडणे खूपच ज़ड ज़ात होते. काही गोष्टी मनाविरुद्ध करायला लागतात; त्यातलीच ही एक.

१ ऑगस्टला ती गेली. "पुण्यवान आहे माझी आजी. टिळकांबरोबर गेली" मी म्हणालो होतो. माझ्याकडून तीच श्रद्धांजली होती. माझ्याबरोबर खेळणारी, खाऊ खाणारी, गाणी म्हणणारी माझी बालमैत्रीण हरवली.

गेल्या वर्षी माझं ३१ जुलैचं अमेरिकेचं विमान पावसामुळे एक दिवस उशीरा सुटलं; म्हणजे १ ऑगस्टला! मी आजीला म्हटलं होतं ना, माझ्याबरोबर अमेरिकेला नेईन म्हणून; थांबली होती ती! आज़ आहे इकडे माझ्याबरोबर.

Saturday, April 15, 2006



छान किती दिसते फुलपाखरू,
गोड किती हसते फुलपाखरू.

रंगीबेरंगी फुलांवर मनसोक्त विहरणारी तशीच रंगीबेरंगी, स्वच्छंद फुलपाखरं आपल्या अवतीभवतीही सतत बागडत असतात, आणि त्यांना पकडायचा प्रयत्न केला की खट्याळपणे आपल्याला चुकवून पळ काढतात. आलंच एखादं हातात, तर त्यानं तासन् तास मनगटावर बसून रहावं आणि आपण त्याला नुसतं न्याहाळत बसावं असं वाटत राहतं. बोटांवर अलगद आपले रंग सोडून ही पाखरं जेव्हा उडून जातात, तेव्हा मागं ठेवलेल्या रंगांत आपलं सगळं आयुष्यच जणू सोडून जातात. त्याचा अभ्यास हा अल्पायुष्यातल्या स्वच्छंदतेचा अभ्यास. ती जगतात त्या आयुष्याचा कधीकधी खूप हेवा वाटतो नाही?!

मलासुद्धा माझ्याच अवतीभवतीची कित्येक फुलपाखरं आठवणींच्या बागेत भिरभिरताना दिसतात. फ़रक इतकाच की ही फुलपाखरं मला कधीच सोडून गेलेली नाहीत आणि जाणारही नाहीत. हाक मारून त्यांना बोलावलं तर तेच रंग घेऊन पुन्हा मला रंगवायला येतील. अशाच काही फुलपाखरांचे रंग माझ्या शब्दांच्या रंगात मिसळून आतापर्यंतच्या आठवणींचा कॅनव्हास रंगवण्याचा माझा बालिश प्रयत्न म्हणजे ही 'माझ्या अवतीभवतीची फुलपाखरं'.